Saturday 13 April 2024

पहिल्यापासून

एकही चुणी न पडलेल्या काळ्याशार चादरीसारखा समुद्र,
एखादाच ढग कपाळावर वागवणारं राखीकबरं आकाश.
फिक्या गोंदणासारखी चांदव्याची बिंदी कोपऱ्यात डौलदार.
पिवळ्या प्रकाशाचं नि बोथट काळोखाचं कॉकटेल झोकून धुंदावलेले जडपाऊल रस्ते.
कुठल्याश्या थेटरातून रस्त्यावर सांडलेली गर्दी मूठभर...
बाकी अपरात्रीच्या प्रहरातली चिमूटभर निखालस शांतता.

असं वाटतं,
कसल्याश्या जहरी फूत्कारत्या डिस्टोपियाला जेमतेमच झाकून घेणारी भूल पडली आहे आसमंतावर.
कुणी आणखी एखाद्या अश्राप जिवाला नख लावण्याची तेवढी देर आहे फक्त - 
वसंतसेनेच्या दागिन्यांसारखा क्षणार्धात निखळून खाली येईल सगळा संभार.
जग नागडं होईल.
पुन्हा सुरुवात,
पहिल्यापासून.

Thursday 4 April 2024

द प्यूमा इयर्स

खूप दिवसांपासून मांजर पाळायचं होतं. 


अंगभूत डौल, शिकारी प्राण्याचे गुण. चकित करणारी चपळाई, सावध चाल, तीक्ष्ण नजर, अफाट श्रवणक्षमता, डोक्याएवढ्या लहान सापटीतून सहजी निसटू शकणारं शरीर, धारदार नख्या आणि दात... असं सगळं असलेलं मांजर पाळीव असलं, तरी मिजास राखून असतं. ती त्याची खासियतच. कितीही प्रेमाचं झालं, तरी मालकाच्या मागे लाळ घोटत येणारं मांजर दुर्मीळ. अशा मांजरांचा भोवतालचा वावर सुखावतो, शांतवतो. त्या मोहानं अनेकदा मांजर घरी आणायचे प्रयोग केले. पण त्यांतला एकही यशस्वी झाला नाही. कधी पिल्लाला घरात ठेवायला दारंखिडक्या लावून बसणं जिवावर यायला लागलं. कधी पिल्लाला त्याच्या आईविना चैन पडेना. कधी व्यावहारिक अडचणींपायी मांजराची पाठवणी, तर कधी मांजराच्या मूळ मालकाला विरह सोसेना म्हणून... 


एका पिल्लानं तर फार चटका लावला. घरी येऊन चांगला आठवडा झाला, तरी जवळ येऊ देईना. जेमतेम दीड महिन्याचं पोर. पण काय त्याचा फणकारा! फिस्कारणं, पाय आपटून दात विचकून दाखवणं, ओरबाडणं...  कुणासमोर अन्नपाण्यालाही तोंड लावायचं नाही. आठवडाभर नाना लाड करून पाहिले. उबेला शाली, खेळायला खेळणी, खाण्यापिण्याचे छप्पन्न प्रकार... त्याला सवय व्हावी म्हणून जमिनीवर बसून बोलाचाली, जेणेकरून त्याला भ्यायला होऊ नये. खाली बसून धीम्या आवाजात वाचणं-बोलणं, संथ हालचालींनिशी वावरणं, आवाज वा पारा चढू न देता त्याला दिलासा देत राहणं... एक ना दोन. पण ते दाद देईना. चिडक्या आवाजात ओरडत राहायचं. शेवटी बहुधा रागानं, अगतिकतेनं, ताणामुळे ते कुठेही हगू-मुतू लागलं. इवलासा मुका जीव. आपल्या हौसेपायी त्याचा सुखाचा जीव दुःखात का घालावा, असा प्रश्न पडला. असहाय वाटायला लागलं. कसेबसे आठ दिवस काढले. पण त्याच्या शीतून रक्त पडायला लागल्यावर मात्र धाबं दणाणलं. त्याला टोपलीत घालून डॉक्टर गाठला. 


“हे खूपच आक्रमक स्वभावाचं आहे. वय वाढलं की त्याची ताकद वाढत जाईल. कसं झेपेल तुम्हांला? शक्य असेल तर त्याच्या आईकडे परत सोडाल का त्याला?” असा निस्संदिग्ध सल्ला मिळाला. तो मानला. तशी साहेबांच्या म्यांवचा सूर बदलला. जुन्या ओळखीच्या परिसरात ते बागडू लागलं. येताजाता त्याला कोवळ्या सुरात साद घातली की ते म्यांव करून हाकेला ओ देई. खायला-प्यायला दिलं, तर सावधपणे स्वीकारी. पण त्यापल्याड ओळखीची रेष त्यानं कधीच ओलांडली नाही. 

त्याची रोखून बघणारी पण सावध नजर पक्की लक्षात राहिली.


या अनुभवानंतर माझी प्राण्यांकडे बघण्याची नजर बदलून गेली. आपल्याला वाटतं, तशा त्यांना फक्त अन्नाच्याच भुका असतात असं नव्हे. त्यापलीकडे आवडी-निवडी असतात, प्राधान्यक्रम, मूड्स, स्वभाव, भावनिक गरजा, ताणतणाव, आग्रह, हट्ट, त्यातून येणारी दुखणीखुपणी... सगळं असतं. आपण विश्वासाचा पूल बांधायला कमी पडतो – कारण आपल्याला एकमेकांची भाषा अवगत नसते, हे तर झालंच. पण त्याहून खरं म्हणजे, आपली दृष्टी बेपर्वा आणि मानवकेंद्रित असते. 

हे चरचरून लक्षात येऊ लागलं, त्या टप्प्यावर लॉरा कोलमनचं ‘द प्यूमा इयर्स’ हे पुस्तक मला मिळालं. 

‍~ 



बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातला एक विकसनशील देश. इतर विकसनशील देशांपेक्षा त्याची कहाणी फार वेगळी नाही. भ्रष्ट सरकार. गरीब, नाडलेले, शोषित लोक. अस्ताव्यस्त, निबीड, गर्द, स्तिमित करणारं जंगल आणि त्यातले प्राणी. लाकूड आणि खनिजं यांसाठी त्या जंगलावर डोळा ठेवून असलेल्या बड्या कंपन्या. विकासाच्या नावाखाली वाढते रस्ते. विरळ होत जाणारं, लचके तोडले जाणारं, नैसर्गिक आणि कृत्रिम वणव्यांखाली भाजून काढलं जाणारं, अपरिहार्यपणे आटत-आक्रसत जाणारं जंगल. हक्काचा अधिवास गमावणारे, परागंदा होणारे, कधी कुणा श्रीमंती फॅडपायी शिकार होऊन कातडी वा दातरूपानं उरणारे, कधी सर्कशीत विकले जाणारे, कधी कुणा अतिश्रीमंत विकृत चाळ्यांपायी ‘पाळीव’ केले जाणारे, अक्षरशः मुक्यानं सोसणारे प्राणी. 


नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुकाळ, आधुनिक युगातल्या विकासाची ओढ, अकार्यक्षम-भ्रष्ट राजवट – हे सगळं एकत्र आल्यावर जी घडते, तीच बोलिवियाचीही कहाणी. 


‘द प्युमा इयर्स’ हे अनुभवकथनात्मक पुस्तक अशा बोलिवियामध्ये घडतं. 


तिथल्या जंगलातल्या प्राण्यांचं बेकायदेशीर ट्रॅफिकिंग चालतं. सरकारी प्रयत्नातून त्यांपैकी काही रॅकेट्सवर धाडी पडतात, गुन्हेगार पकडले जातात. प्राणी ताब्यात घेतले जातात. पण त्या प्राण्यांनी कुठे जावं? खूप लहान पिल्लं असताना पकडले गेलेले हे प्राणी ना धड जंगलात जगू शकत, ना बंदिवासात. या प्राण्यांच्या अपेष्टा सहन न होऊन कुणीतरी आंदोलन उभं केलं. प्राण्यांच्या अंदाधुंद छळावर नियंत्रण आणलं. लहानपणी नैसर्गिक अधिवासात न वाढलेले आणि आता मोकळे केलेले वन्य पशू सांभाळण्यासाठी पदरचा पैसा खर्चून एक जमीन खरीदली. तिथे अभयारण्य आणि प्राणिसंग्रहालय यांच्या मधली एक व्यवस्था उभी केली. प्राण्यांना खायलाप्यायला मिळावं, त्यांना माफक का होईना – जंगलासारखा अनुभव देणार्‍या अधिवासात वावरता यावं, आपण त्यांच्यावर लादलेल्या छळाचं थोडं परिमार्जन करता यावं अशी ती यंत्रणा. 'एल पार्के' नावाची. अपुरा निधी, जगभरातून – विशेषतः विकसित देशांतून – कुतूहलानं येणारं स्वयंसेवक, आणि काही माणसांचं या प्राण्यांवरचं प्रेम – इतक्या बळावर चालत राहिली.


रंगीत काकाकुवे आणि पोपट, निरनिराळ्या जातींची माकडं, रानडुकरं, आणि मांजरं. पण मांजरं म्हणजे घराच्या उबेला राहणारी मांजरं नव्हेत. मोठ्ठाली मांजरं. बिबट्ये, सिंह, जॅग्वार आणि प्युमा! 


कुणी छळापोटी चिडखोर बनलेलं. कुणी निराशेनं ग्रासलेलं. कुणी आत्महत्याप्रवण. कुणी अपंग. कुणी पंख छाटलेलं... त्यांना सर्वतोपरी जगवणारी माणसं. 


त्या पार्कात लॉरा कोलमन जाऊन पोचली. ती तिथे कशी येऊन पोचली हाही एक मजेशीर योगायोगच आहे. मूळची ब्रिटिश असलेली चोवीसेक वर्षांची लॉरा. मानसोपचारतज्ज्ञ आईबाप, आपापल्या चमकदार व्यवसायांत यशस्वी असलेली भावंडं, उत्तम शिक्षण इ. असलेली ही मुलगी. आयुष्यात अद्याप स्थिरावत नव्हती. चारचौघींसारखी प्रेमप्रकरणं-लग्न-मुलंबाळं या चाकोरीत रस वाटत नव्हता, पण त्या अपेक्षांचं दडपण जाणवत होतं असावं. कामही मनासारखं मिळत नव्हतं. आज ही नोकरी, उद्या ती नोकरी, परवा कुठल्यातरी टूरिस्ट कंपनीत  मार्केटिंग कर, तेरवा प्रवासाला नीघ... शरीराबद्दल आत्मविश्वास नाही, वागण्यात ठेहराव नाही. नुसतीच भिरभिर भिरभिर. निबर-कोडग्या महत्त्वाकांक्षेचा अभाव. संवेदनशीलतेपोटी कायम मनात वस्तीला आलेली व्याकूळता... असं करता करता एका प्रवासादरम्यान तिनं हार पत्करून घरी परतायचं ठरवलं होतं. त्याकरता कुठल्यातरी सायबर कॅफेत विमानाचं तिकीट काढत असताना तिथल्या भिंतीवरचं 'एल पार्के'तर्फे स्वयंसेवकांना आवाहन करणारं पत्रक तिच्या नजरेस पडलं. त्यात ना फार पैसे होते, ना फार आकर्षक असं काही काम. निव्वळ 'नाहीतरी दुसरं काय करायचंय, हे करून बघू' अशा अनिर्णितावस्थेत लॉरा पार्कात गेली.


ती जेमतेम महिन्याभरापुरती पार्कात आलेली. तिला बोलिवियाच्या जंगलातली उष्णदमट हवा, अस्वच्छता, अन्नाचं वेगळेपण, सगळीभर वावरणारे प्राणी, शारीरिक कष्टांचं काम… यांतलं काहीच सवयीचं नव्हतं. ती सुरुवातीला धसकली, श्रमली, भ्यायली, रडली. एक महिना झाला की परत जायचं, असं घोकत ती तिथे राहिली. 


तिला त्या पार्कमधल्या ‘वायरा’ नामक प्यूमाला फिरवून आणण्याचं काम मिळालं. 


वायरा ही एक पूर्ण वाढलेली प्यूमा मादी. वाघ-सिंह वा बिबट्याइतकीच हिंस्र, पण बुजरी. लहानपणापासून कुणीतरी कोंडून ठेवल्यामुळे कुणावरच चटकन विश्वास ठेवू न शकणारी, संशयी-सावध, जंगलात जगण्याचा अनुभव आणि क्षमता नसलेली, जंगलालाही भिणारी. तिला तिच्या लहानशा पिंजर्‍यातून बाहेर येता यावं, जंगलाच्या हवेत थोडं फिरता यावं-रमता यावं, म्हणून तिला मोठ्ठा दोर लावून पिंजर्‍याबाहेरच्या राखीव तुकड्यात बाहेर काढून फिरवून आणण्याचा प्रघात होता. तिला फिरवून आणणार्‍या मुलीच्या हाताखाली लॉराला काम मिळालं. 


लॉरा हळूहळू तिथे रुळली. तिचं जंगलाशी नातं जुळत गेलं. तिथल्या अनागर, उग्र, रंगा-गंधा-नादांशी. तिथल्या शांततेशी. तिथल्या भौतिक सोयींच्या अभावांशी. 


तिथल्या प्राण्यांच्या अश्राप प्रेमाशी, भित्यांशी, असुरक्षिततांशी.



लॉरानं अगदी सुरुवातीच्या वेळी वायराकडे जाताना अनुभवलेल्या जंगलाचं वर्णनही अद्भुत म्हणावं असं आहे. 


 ... मी अंधारात अडखळतं पाऊल टाकलं. पायाखाली खडबडीत उखीरवाखीर ढेकळं होती आणि हवेला दवाचा वास. भोवती माझ्यापेक्षा उंच वाढलेलं जंगली गवत. मी हातानं ते वारायचा प्रयत्न केला, पण पात्यांना चांगलीच धार होती. जेमतेम काही फुटांवरचं कसंबसं दिसत होतं-नव्हतं. जंगलात दोनच ऋतू असतात - ओला नि कोरडा. मी जंगलात आले होते ती एप्रिलमध्ये. पाऊस संपून पाचेक महिने झालेले. आत्ता जंगलं जितकं सुंदर असतं, तितकं एरवी क्वचितच असतं. हळूहळू पाण्याची चणचण जाणवू लागेल आणि जमीन भेगाळेल. पण आत्ता? आत्ता मात्र जंगल मनाला दडपून टाकेलं असं नि इतकं देखणं दिसतंय. एकूण एक रंग जणू हिरव्याच्या जवळ गेला आहे नि जंगलानं ते सगळे रंग एकदम ल्याले आहेत. . . . राक्षसी झाडं, त्यांची अकराळ-विकराळ मस्तकं, खोडांच्या तपकिरी सालट्या सुटत चाललेल्या, अंगाखांद्यावर काटेदार चिलखतं. . . . एकमेकांच्या अंगाखांद्यावर चढलेली, गळ्यात पडलेली, गळे दाबणारी झाडंच झाडं... . . . हे एखादं स्वप्न तर नव्हे? मी त्यातून वाट काढताना विचार करत होते. धपापणारा श्वास असलेल्या अशा जिवंत ठिकाणी मी कधीच आले नव्हते आजवर. कितीतरी जीव स्पंदत होते माझ्या भोवतालात. लंडन अंडरग्राउंड ट्यूबमधली माणसांची गर्दी माझ्या डोळ्यासमोर आली. माणसांच्या घामाचा दर्प आणि जागेसाठी अव्याहत धडपडणारी माणसंच माणसं. तिथेही आजूबाजूला अनेक आयुष्यं धडधडत असायची. पण ती सगळी एकसारखीच होती. माझ्यासारखीच होती. इथे? इथे सगळंच माझ्याहून पूर्ण वेगळं. …


या जंगलानं लॉराला हळूहळू ताब्यात घेतलं. जंगलानं तिला बदलून टाकलं. लॉराच्या पार्कातल्या सहकारिणीच्या शब्दांत सांगायचं, तर ‘त्या प्राण्या-माणसांनी स्वतःच्या बचावासाठी स्वतःभोवती उभा केलेला एकेक थर त्या जंगलानं जणू हळूहळू सोलत नेला.’ आतलं अनाघ्रात कोवळेपण हळूहळू उजळत गेलं. त्या प्रक्रियेची ही गोष्ट.


वायरानं सुरुवातीला लॉराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्या दोघींना एकमेकींची सवय होत गेली. वायरानं लॉराचा हात पहिल्यांदा चाटला, त्या प्रसंगी लॉरानं नोंदलेली स्वतःची प्रतिक्रिया मुळातूनच वाचण्यासारखी आहे. भीती, अविश्वास, स्थिरावलेपणाची चकित करणारी भावना, आनंद... असे अनेक टप्पे तिनं अक्षरशः निमिषभरात ओलांडले. हळूहळू तिच्याबरोबर फिरताना, तिचा विश्वास बघताना, वायराचा शांत श्वासोच्छ्वास अनुभवत तासचे तास जंगलात पेंगत बसून राहताना लॉराला जणू पायाखालची जमीन सापडत गेली. या प्राण्यानं आपल्याला जितकं शूर मानलं आहे, तितके आपण नाही, पण त्यानं काही बिघडत नाही, आपण शिकू शकू... ही जाणीव पचवत लॉरा शांत होत गेली. 


वायरानं लॉरावर विश्वासून टाकलेलं एकेक बिचकतं पाऊल, तिच्या नजरेतली भीती आणि उग्र दहशत, तिच्या उरातली गुरगुर, एका टप्प्यावर तिनं लॉरावर केलेला हल्ला... आणि मग एक दिवस लॉराच्या उरावर घुसळलेलं मस्तक... हा सगळा अवाक करून टाकणारा प्रवास लॉरानं या पुस्तकात नोंदला आहे.


पण ‘द प्यूमा इयर्स’ केवळ या नात्याची गोष्ट सांगणारं पुस्तक नाही. 


मराठीतही प्राणी आणि माणसं यांच्यातल्या प्रेमाची गोष्ट सांगणारी अनेक पुस्तकं आहेत. पशुवैद्य विनया जंगलेंचं 'मुक्या वेदना, बोलक्या संवेदना' आहे. पशुवैद्य लेखिकेचं सुसंस्कृत, जिद्दी आणि प्राण्यांवर माया करणारं व्यक्तिमत्त्व या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतं. सर्कशीतले रिंगमास्टर दामू धोत्रे यांनी लिहिलेलं 'वाघसिंह - माझे सखेसोबती' हे अद्भुत आत्मचरित्र आहे. विलास मनोहर यांचं 'नेगल' पुष्कळ लोकप्रिय आहे. आदिवासींनी भुकेपोटी शिकार करून मारलेल्या प्राण्यांची पिल्लं सांभाळण्यातून हेमलकसामधल्या त्या प्रकल्पातल्या प्राणिशाखेची सुरुवात झाली. अनेक गैरसोयी सोसत प्राण्यांची काळजी घ्यावी लागे. सरकारी अधिकार्‍यांची मर्जी सांभाळावी लागे. पूर्वायुष्यात चक्क शिकारी असलेल्या विलास मनोहर यांचं या अनुभवादरम्यान एका प्राणिप्रेमी व्यक्तीत परिवर्तन झालं. डॉ. पूर्णपात्रे यांचं त्यांच्या लाडक्या सिंहिणीवरचं 'सोनाली' हे पुस्तकही सुरेख आहे. व्यंकटेश माडगूळकरांचं 'सत्तांतर' एका वानरटोळीचं शब्दचित्र रेखाटणारी कादंबरी आहे. वानरांमधली जगण्यासाठीची स्पर्धा आणि क्रूर निसर्ग यांचा अविस्मरणीय अनुभव ‘सत्तांतर’ वाचताना येतो.


पण या सगळ्या पुस्तकांहून ‘द प्यूमा इयर्स’ वेगळं आणि कितीतरी अधिक भेदक आहे. कारण प्राण्यांची ही अवस्था नक्की कशामुळे होते, त्यात प्रत्यक्ष ट्रॅफिकिंग करणार्‍या माणसांखेरीज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कुणा-कुणाचा सहभाग असतो, त्याबद्दल कुणाला किती भान असतं, असे अनेक प्रश्न हे पुस्तक विचारतं. 


लेखिका पार्कमध्ये राहत असताना हळूहळू जंगलातून लाकडाची ने-आण करणार्‍या ट्रक्सची रहदारी वाढत जाताना दिसत होती. जंगल विरळ होत जात होतं. दर काही वर्षांनी मोठाले वणवे लागत असत. एका टप्प्यावर अशाच एका वणव्यापासून पार्क वाचवण्याच्या प्रयत्नात तीन आठवडे खर्ची पडले. पावसाळ्याचा ऋतू नव्हता. पाण्याचं दुर्भिक्ष होतं. प्राण्यांचा जीव वाचवायचा की त्यांचा अधिवास वाचवायचा? की आपला जीव? आग पसरू नये म्हणून सगळं सोडून जिवाच्या आकांतानं चर खणायचे की हताश होऊन विध्वंस बघत राहायचा? कुठवर? आपण पुरे पडू शकू का त्याला? असे  अनेक प्रश्न. पण त्यांना सामोरं जात लॉरा आणि तिचे सहकारी नेटानं काम करत राहिले. परिस्थितीच्या रेट्यासमोर आपण हतबल, असहाय असल्याचं कळूनही, भावनिक-शारीरिक श्रम ओतून उभं केलेलं जग पुन्हा पुन्हा मोडून पडत असताना स्वतःच्या डोळ्यांनी बघावं लागत असूनही, पार्क वाचवत राहिले. 


हे वणवे नैसर्गिक कारणांमुळेच लागतात असं नाही, असं लेखिकेनं नोंदलं आहे. सरकार नामक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं, क्वचित बेकायदेशीर गोष्टींकडे काणाडोळा करत असल्याचंही नोंदलं आहे. जंगलात राहणार्‍या स्थानिक लोकांची मोजकी चित्रणंही आहेत. वायरा पार्कमधून पळून गेलेली असताना असाच एक स्थानिक 'शिकारी' माणूस लॉरा आणि सहकार्‍यांची घालमेल समजून घेतो. शब्दही न बोलता वायराचा माग काढायला मदत करतो. त्याचा जगण्यासाठी चालू असलेला झगडाही अपरिहार्यच आहे, हे लॉराला जाणवून जातं. अशा वेळी तिला ‘विकास’ या शब्दाभोवती असलेले पेच दिसू लागतात. प्राण्यांची अशी ससेहोलपट का होते? जंगल तुटतं म्हणून? ते का तुटतं? विकास हवा म्हणून? विकास म्हणजे काय? अजून वेगवान प्रवास, अजून काही छानछोकीच्या वस्तू, अजून थोडी चैन? कुणाची? स्थानिक लोकांची? की जगभर हातपाय पसरणार्‍या भांडवलशाहीची? 


या प्रश्नांमधून लॉरा आणि तिचे सहकारी स्वतःलाही सोडत नाहीत. पार्कमध्ये राहून रोज या प्रश्नांशी झगडणं ताकद मागणारं, थकवणारं, निराश करणारं खरंच. पण घरी परतून प्राण्यांपासून दूर राहणंही न सोसणारं. मग काय करायचं? विमानानं ये-जा करायची? आणि इंधनासाठी अ‍ॅमेझॉनमधलं जंगल संपवणार्‍या लोकांपैकी एक व्हायचं? अहं. विमानाच्या फेर्‍या अगदी जीवनावश्यक मानायच्या आणि शक्य तेवढी काटकसर करत जिथे असू तिथून भोवतालचा निसर्ग वाचवत राहायचं, असा एकमात्र पर्याय उरतो.

 

आपण जरी मुंगीलाही इजा न करण्याइतके तथाकथित अश्राप असलो, तरी या पापाच्या भारातून आपली सुटका आहे का, असा प्रश्न या पुस्तकातून उभा राहतो. हे ‘द प्यूमा इयर्स’चं वेगळेपण आहे. 


वाघ-सिंह-चित्ते यांसारखी मोठी शिकारी जनावरं त्यांच्या परिसंस्थेचं अक्षरशः सम्राटपण अनुभवतात. एक जिवंत वाघ निरोगीपणे नांदण्यासाठी एक विशिष्ट आकाराचा मोठा अधिवास असावा लागतो. त्या अधिवासाची स्वतःची अशी अन्नसाखळी असते. त्याच्या जिवावर वाघ जगतो. पिरॅमिडच्या वरच्या त्रिकोणातल्या मोजक्या जागेत, मोजक्याच संख्येनं राहून राज्य करणार्‍या सम्राटासारखा त्याचा वावर असतो. त्यातून त्याच्या देहबोलीतली लय, तंदुरुस्ती, देखणेपण, डौल, चपळाई, ग्रेस... हे सगळं येतं. 


या विलक्षण वैभवाचं आपण नक्की काय आरंभलं आहे, असा प्रश्न ‘द प्यूमा इयर्स’ वाचताना पुन्हा पुन्हा पडतो. आपणही संडास-आंघोळीसारख्या रोजच्या वापरासाठी अनेक बादल्या पाणी बिनदिक्कत आणि सहज फ्लश करून टाकतो. जगाच्या एका टोकाला पिकणारं अन्न बेपर्वाईनं दुसर्‍या टोकाला मागवतो. कुठल्याही ऋतूतलं अन्न बारा-महिने-तेरा-काळ पिकवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ऊर्जा खर्च करतो. विमानप्रवास स्वस्त झाला आहे आणि सगळीकडे ‘एअर बी एन बी’सारख्या कंपन्यांनी सुविधा दिल्या आहेत, म्हणून पैसे उधळून प्रवास करतो. आणखी-आणखी-आणखी मजा करतो, करत राहतो. ह्या भुकेतून किती नैसर्गिक साधनसंपत्ती खर्च होते आणि पिरॅमिडच्या टोकावर जगणारे किती प्राणी छळ सोसतात... याचा विचारही आपल्या गावी असत नाही. 


आणि त्याच वेळी लॉरा कोलमनसारखी विशी-पंचविशीतली मुलं अशा प्रश्नांना न भिता प्राण्यांवर वेडं प्रेम करत राहतात. थकतात, विझतात, क्षणिक माघार घेतात, आणि पुन्हा नव्यानं भिडतात. त्यांच्या या लढ्यातली भावनिक ससेहोलपट बघताना नतमस्तक आणि हताश असं दोन्ही वाटतं. 

~


वायरा पार्कमधून पळून गेली. परत आली, तेव्हा भीतीपोटी तिनं हातात दोर घेऊन पुढे जाऊ बघणार्‍या लॉरावर हल्ला केला. त्यानंतर तिच्या पिंजर्‍यात जाणार्‍या लॉराला सुरुवातीला वाटणारा भीतीचा धसका जाणवत होताच, पण अगदी आपल्यासारख्याच असलेल्या, स्नेही झालेल्या या मुक्या प्राण्याचा विश्वास आपल्याला पुन्हा लाभावा, ही ओढही होती. त्यापायी वायराच्या पुढ्यात जाण्याचा धीर तिनं केला. 


त्या क्षणांचं वर्णन वाचताना आपल्याला भीती वाटतेच. पण त्याहीपलीकडे फार आसुसून वाटतं, की या मुलीच्या मनातली ओढ वायराला कळावी. तिनं लॉरावर विश्वास टाकून पाहावा... 


लेखिकेचे शब्द असे आहेत : 


. . . हळूहळू श्वास सोडत मी हात सावकाश तिच्याकडे सरकवला. तिनं मला चाटायला सुरुवात केली. माझ्या हातावर तिची ओली जीभ घासली जाण्याचा आवाज मला जगातला सर्वांत सुंदर आवाज भासत होता. बधीर झाल्यासारखं वाटत होतं. डोळ्यांतून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. पुढे होऊन तिच्या मानेवर डोकं ठेवलं. एकदम सैल सैल वाटलं. . . . हवेची रेशमी झुळूक झाडांच्या फांद्यांवरून फिरली की जसा मातकट वास येतो, तसा वास येत होता वायराला. तीही अविश्वासानं आणि आनंदानं पुढे होऊन माझ्या अंगावर रेलली होती... 


भांडवलशाही आणि तिनं बदलत नेलेल्या जगाचे प्रश्न राहत नाही शेवटी मनात. उरतात ते डिप्रेशनशी लढणार्‍या माकडांना प्रेमभरानं जवळ करणारे लॉराचे सहकारी. समा नावाच्या सिंहाला 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स' वाचून दाखवणारी लॉरा. रात्रीचं चमचमतं आभाळ आणि शांतता वागवणारं हिरवंकंच जंगल. लॉरा आणि वायरा यांचं बिचकत बिचकत विश्वासून एकमेकींवर रेलणं. शांत होऊन, धीर करून नवे अनुभव घेऊन पाहणं. पोहायला पाण्यात उतरणं, नव्या वाटा हुंगून पाहणं, थारावत जाणं. 

~


आपल्याला कधीच मांजर पाळता येणार नाही, हा माझ्या मनातला सल या पुस्तकानं मिटवून टाकला. तिथे एका आशेला जागा करून दिली. स्वतःपलीकडे जाऊन विचार करता आला, धीर धरता आला, अनिश्चितता स्वीकारता आल्या... की जमेल. तोवर धीर धरायला हवा. 


आता लॉरा बोलिवियात राहत नाही. पण वायराशी तिचं नातं अभंग आहेच. लॉरानं ONCA नावाची संस्था सुरू केली आहे. सामाजिक-पर्यावरणीय प्रश्नांवर सर्जनशील उत्तरं शोधू बघणार्‍या या संस्थेच्या नावाचा अर्थच मुळी आहे - प्यूमा. Panthera Onca म्हणजे प्यूमा. वायराच्या माध्यमातून लॉरानं सगळ्या निसर्गाशी मैत्री करणारं पाऊल पुढे टाकलं आहे.

~


द प्युमा इयर्स

लॉरा कोलमन

प्रथमावृत्ती २०२१

लिटिल ए प्रकाशन


('अनुभव' या मासिकांमध्ये फेब्रुवारी २०२४ या अंकात पूर्वप्रकाशित)

Wednesday 6 September 2023

मराठी नट्या ०३

सगळ्यांत पहिल्यांदा तिला कधी पाहिलं हे आता मला नीटसं आठवत नाही. अर्थात, मुक्ताला ही दाद वाटणं शक्य नाही. तिला बघावं आणि ती लक्ष्यात राहू नये, अशी तिच्या अभिनयाची शैलीच नाही. चार्म्स आणि हेक्सेस आणि स्पेल्सची आतिषबाजी करत एखाद्या जादुगारणीनं एखाद्या द्वंद्वात एंट्री घ्यावी, तशी तिची शैली. भक्ती बर्वेंना बघताना मला कायम मुक्ताची आठवण येत आली आहे. हे वाक्य उलट असायला हवं, ना? आय नो. पण मी भक्ती बर्वेंना रंगमंचावर बघितलेलं नाही. आणि माझ्या डोक्यात मुक्ताच इतकी 'छाई हुई' आहे, की आहे बाबा हे असंच, उलट. तर – भक्ती बर्वेंच्या अभिनयात ही एक "बघ हं, आता मी कशी गंमत करणार आहे!" असं सांगणारा एक सूक्ष्म पण झगझगीत धागा आहेसा मला वाटतो. अचूक तीच छटा मुक्ताच्या कामात आहे. त्यामुळेच तिचं 'चारचौघी'तलं काम बघायला जाण्यापूर्वी मी किंचित धास्तावले होते. पण... छे! हे पुष्कळ पुढचं.

तर – तिला अगदी सुरुवातीला पाहिल्याचं आठवतं, ते टीव्हीवर. 'पिंपळपान'मध्ये सानियाच्या 'आवर्तन'वर आधारित असलेल्या कथानकात – स्वरूप या काहीशा बोल्ड, अमेरिकेत वाढलेल्या बहिणीच्या भूमिकेत. स्वरूपचा प्रॅक्टिकल आणि प्रेमळ सूर तिनं अचूक पकडला होता. पण त्या भूमिकेत काही मेस्मरायझिंग नव्हतं. उलट त्याआधी 'घडलंय बिघडलंय'मध्ये ती आणि आतिशा नाईक पाणवठ्यावर जाणार्‍या दोन गावरान बायकांची सोंगं काढत असत. त्यात आतिशा नाईक वयाला साजेसं लुगडं नेसून असे. तर मुक्ता – गावातल्या सेमी-तरुण पोरी परकर नेसून त्यावर शर्ट घालतात, तसल्या अवतारात. शर्ट आणि परकर, कमरेवर घागर, घट्ट वळलेल्या वेणीला रिबीन, तरी लटा काढलेल्या. आणि दोघींच्याही चेहर्‍यावर अत्यंत बेरकी – स्मार्ट – मापंकाढू भाव. ती आणि आतिशा अक्षरशः हैदोस घालायच्या त्यात. मग तिचं संजय मोने आणि जितेंद्र जोशीबरोबरचं 'हम तो तेरे आशिक है' पाहिलं होतं. त्यात ती मुस्लीम मुलीच्या भूमिकेत होती. जितू आणि मुक्ता दोघं एकत्र असतील, तर काय होईल, अशा कल्पनेनं चेकाळून नाटकाला गेलेल्या मला, तितकीशी मजा आली नव्हती. त्यात नाटकाचा भाग होता, तसा 'मुक्ता जरा स्वतःच्या प्रेमात आहे का?' अशी शंका चाटून जाणंही होतं. ती पहिली धोक्याची सूचना. पण ती कायम धक्के देतच राहिली. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' नावाची (बहुधा सतीश राजवाडेची) मालिका होती. त्यात तिनं तिच्या 'मुंबई पुणे मुंबई'मधलाच, शहरी, लग्नानंतरच्या तडजोडींना बिचकणार्‍या आधुनिक मुलीचाच पार्ट कंटिन्यू केला होता. पण काय लाजवाब केला होता! स्वप्नील जोशी आणि ती यांचे प्रसंग दोन चांगले नट एकत्र आले की व्हायचेच, तितपत चांगले व्हायचे. पण तिच्या वडलांच्या भूमिकेत असलेल्या विनय आपटेंबरोबर?! काहीच्या काहीच केमिस्ट्री. आईवेगळी, एकुलती एक लेक. तिला तिचा बाप लग्नाआधी पोळ्या करायला लावतो असा एक प्रसंग होता. कधीही स्वैपाकाला हात न लावलेल्या मुलीचं अशा वेळी जे होईल तेच तिचं होतं. त्यात बापाची दंडेली. पण बापावर प्रेम आहेच. त्या सगळ्यानं उडणारा तिचा भडका, फ्रस्टेशन, बापाच्या बोलण्यात काहीतरी रास्त असल्याचा भाव, चिडचिड, रडू कोसळणं.... हे सगळं अक्षरशः अ – फा – ट होतं. विनय आपटेंना दाद द्यावी की तिच्याकडे बघावं हे न कळून चिडचिड झाली होती माझी, इतकी खास त्यांची केमिस्ट्री. 'कबड्डी कबड्डी'मधलं तिचं काम कबड्डीपटू मुलीचं. विनय आपटे बापाच्या भूमिकेत. दारुड्या भावाचं कबड्डीचं वेड नि त्यातून झालेली त्याची फरफट सोसणारा तो माणूस कबड्डीच्या पूर्ण विरोधात. त्यातून झालेली पोरीची नि बापाची जुगलबंदी होती त्यात. एखाद्या खेळाडूचेच असावेतसे न ठरणारे पाय, अंगातली न संपणारी ऊर्जा, उसळतं बंड... असं सगळं असलेली ती भूमिका मुक्तानं कहर केली होती. तीनेकदा तरी मी ते नाटक पाहिलं. तसंच 'फायनल ड्राफ्ट'ही. ते तर तिचं 'घरचं' नाटक. ती, मिलिंद फाटक, रसिका, नि गिरीश जोशी स्ट्रगलच्या काळात एकत्र राहत म्हणे. त्यामुळे तिचं गिरीशबरोबर ट्यूनिंग असणार यात शंका नव्हतीच. त्यातलीही भूमिका अशीच खास. गावातून आलेली, थापेबाज, बेरकी, पण अंगात लिहायचा किडा असलेली, काहीतरी सच्चं सांगण्याजोगं जवळ असलेली तरुण मुलगी. तिचा बनचुका, आयुष्याचं दार लावून कोरडा झालेला, जगण्यातला रस हरवून गेलेला शिक्षक. त्या दोघांच्यातली देवाणघेवाण होताना ठिणग्या उडाल्याचा भास होई. त्या नाटकाच्या एका प्रयोगात अत्यंत इंटेन्स प्रसंग चालू असताना प्रेक्षकांतलं कुणीतरी बोलायचं थांबेचना. शेवटी गिरीश जोशी बेअरिंग सोडून, थांबून, थेट तिकडे बघून म्हणला, "हे असं नाही चालू शकत. मी थांबतोय. तुम्ही बाहेर जा. मगच मी सुरू करीन." त्यात एक फायनॅलिटी होती. त्या बाई बाहेर पडल्या. त्यात दहा मिनिटं तरी गेली असतील. तोवर मुक्ता तिच्या भांबावलेल्या-चिडलेल्या-हट्टी मुद्रेत तशीच्या तशी पुतळा होऊन थांबलेली. "हां, सुरू करू." या गिरीश जोशीच्या एका वाक्यासरशी फ्रीज केलेली फ्रेम सुरू व्हावी, तशी सुरू. मी नाटकाइतकीच या हुकुमतीच्या दर्शनानं अवाक झाले होते.

नंतर तिला पाहिल्याचं आठवतं ते 'एक डाव धोबीपछाड' या वाह्यात सिनेमात. त्यात ती अशोक सराफांनी रंगवलेल्या एका श्रीमंत बापाची आईवेगळी लेक होती. नसलेल्या आईचा वास्ता देऊन, बापाला कसं गुंडाळायचं याचं रामबाण शास्त्र बनवणारी ती पोरगी. तिच्या बोलण्यातला गावरान लहेजा, छानछोकीची हौस असल्यानं नि तंत्रज्ञानाच्या एक्स्पोजरमुळे आलेले चुकीच्या उच्चारांतले इंग्रजी शब्द नि त्यातला स्टाईलमारूपणा, बेरकीपणा... एकुणात तर्‍हतर्‍हेच्या पुरुषांना खेळवण्यातलं कौशल्य नि ते आपल्याकडे आहे याचं भान... असं सगळं त्या कामात ठासून भरलेलं होतं. अशोक सराफांबरोबरचे तिचे प्रसंग बघणं म्हणजे... काय टायमिंग, काय प्लेसिंग, काय सफाईदार मेळ... असो. याबद्दल मी कितीही वेळ बोलू शकीन. दुसरी अशीच भूमिका म्हणजे तिचं 'जोगवा'मधलं उपेंद्र लिमयेबरोबरचं काम. केसांत जट आल्यामुळे देवदासी झालेली ती मुलगी. अंधश्रद्धेपोटीच लुगडं नेसून तृतीयपंथी म्हणून फिरणार्‍या उपेंद्र लिमयेशी तिचं सूत जुळतं. 'जीव रंगला' या गाण्यात त्या दोघांची शारीरिक जवळीक घडताना दिसते. अजय-अतुलचं संगीत, दिग्दर्शक राजीव पाटलांनी वापरलेल्या जुन्या घराच्या माडीच्या पावसाळी चौकटी, आणि अर्थात उपेंद्र लिमये – या सगळ्यांची कामगिरी थोरच आहे. पण मुक्ता – उफ्फ्! त्याच्या पोलक्याची बटणं काढून त्याच्या रुंद छातीवर हात फिरवताना तिचं बिचकणं आणि अखेर मोहाला शरण जाणं नि तेव्हाची तिची मुद्रा... देवा, इतका अस्सल शृंगार पडद्यावर पाहिल्याची आठवण मला नाही. 

मुक्तावर इतकं प्रेम असल्यामुळे आणि तिच्यातल्या त्या भक्ती-बर्वे-धाग्याची धास्ती असल्यामुळे 'चारचौघी' बघायला जाताना मला किंचित ताण होता. इतक्या सुंदर, भावखाऊ भूमिकेत, इतक्या वर्षांनी रंगमंचावर येताना आपलं पाणी सिद्ध करून दाखवण्याच्या दडपणाखाली तिच्याकडून काही अधिक-उणं होऊ नये अशी ती धाकधूक. अतिप्रेमापोटी आलेली. पण बाई आल्या, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं! नवर्‍याच्या विश्वासघातानं आलेलं हबकलेपण, त्यातून आईपाशी उलटा कांगावा करणं, उद्ध्वस्त होणं, आईनं झापल्यावर भानावर येणं, हळूहळू स्वतःचा करारी सूर शोधत जाणं, कणखर होणं... दृष्ट लागण्याजोगं सगळं. त्यात ती तिच्या नवर्‍याशी फोनवर बोलते असा एक मोठा प्रसंग आहे. त्या प्रसंगातला तिचा संताप, नवर्‍याबरोबरच्या शृंगाराच्या आठवणीनं आलेली कासाविशी, दुसर्‍या बाईच्या कल्पनेनं आलेला घायाळपणा, मुलीच्या आवाजानिशी एकाएकी बेभान होऊन रडकुंडीला येणं.. मध्ये बोलणार्‍या आईवर तिरमिरून तिला गप्प करणं... त्या प्रसंगानंतर पहिल्या अंकाचा पडदा पडतो. तो पडदा पडला नसता, तर पुढचं नाटक बघणं जड जावं – असा तो परफॉर्मन्स. रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे... या सगळ्या लोकांची तितकीच जबरदस्त, सहज साथ – हा शब्द त्या तिघींना अन्यायकारक आहे, मला कल्पना आहे, पण त्यांच्याबद्दल लिहिण्याची ही जागा नाहीय – आणि नाटकातली भाषा-आशय... हेही तितकंच मोठं आहे, खरं आहे. पण त्यातली मुक्ता – एखाद्या कोंदणात अचूक शोभणार्‍या हिर्‍यावर एकच प्रकाशतिरीप पडल्यावर तो लखलखतो, तशी ती त्या प्रसंगात झळाळून उठते.

अलिबागजवळ एका कौटुंबिक ट्रिपला गेलो असताना तिथे मुक्ताही आली होती. तीन दिवस सतत दिसत राही ती आजूबाजूला. सुरूंच्या बनातल्या एका टेकाडावर, समुद्राकडे टक लावून, एकटीच निवांत बसलेली दिसायची. तिची तंद्री भंगावीशी वाटली नाही. अखेर आपल्याला इतक्या आवडणार्‍या एखाद्या कलावंताला "तू जाम भारी आहेस!" यापल्याड काय सांगणार, नि त्यावर तो काय म्हणणार, असा नेहमीचाच पेच. त्यापोटी बोलायला जाणं टाळलं. तिच्या सगळ्या भूमिकांमागे आता मला तिची समुद्राकडे बघणारी शांत मुद्रा एखाद्या बॅकड्रॉपसारखी आठवत राहते, हे मला त्याबद्दल मिळालेलं बक्षीस.

मराठी नट्या ०२

आपण दुसऱ्या कुणाला दमदाटी करताना वरच्या दाताखाली खालचा ओठ आवळतो आणि डोकं खाली झुकवतो झटक्यानं, तसं करणारा एक टारगट दादागिरी-भाव रसिकाच्या चेहऱ्यात लपलेला आहे, असा कायम भास होई मला. बघता बघता ती 'क्या बे?' असं म्हणून टगेगिरी करायला लागेल, असं वाटायला लावणारा. मी तिची जी-जी कामं पाहिली, त्यांतली बहुतांश या छटेच्या जवळची होती म्हणूनही असेल. पण ते तितकंच नव्हतं. तिच्या व्यक्तिमत्त्वातच ते काहीतरी होतं असावं.

तिचं 'उंच माझा झोका गं' हे नाटक माझ्याकडून हुकलं. मग एकदम 'प्रपंच'मधली अलकीच. त्या भूमिकेतली रसिका डोक्यात गच्च रुतून राहिली. एकत्र कुटुंबातली मुलगी, नाटकात रस असणारी, स्वतंत्र मतं असलेली, ती बेदरकारपणे मांडायला न कचरणारी, रूढार्थानं बाईपणाच्या झुली चढवायला नकार देणारी, ढगळ्या पुरुषी शर्टपॅंटीत वावरणारी. त्या भूमिकेत 'तसं' काहीही नव्हतं, पण मला कायम ते काम बघताना तेंडुलकरांच्या 'मित्रा'ची आठवण यायची मात्र. मित्रामधली बंडखोरी अलकाच्या भूमिकेत होती. 'सुरणाची भाSजी'चा सूर लावणारी, "आई, अगं एकवीस वर्षांचीय फक्त आपली लतिका. लग्न?" म्हणून कळवळणारी, मंग्यासोबत लग्नाविषयी बोलताना-न बोलताना तिच्या नेहमीच्या नुराला न साजेसा कोवळा गोंधळ घालणारी अलका मला कायम आधी आठवते. रसिकाच्या सगळ्या आठवणीतच अलकाची आठवण वेगळी न काढता येईलशी विरघळून गेली आहे, असं जाणवतं. 

त्याच सुमारास तिचं 'सुपरहिट नंबर वन' नाटक पाहिलं. त्यात ती आणि उपेंद्र दोघं अतिरेकी होते! तिच्या त्या रावडी कामानं तिची प्रतिमा ठसलीच माझ्या डोक्यात. 'व्हाइट लिली नाइट रायडर' पुष्कळ नंतरचं. त्यातलं तिचं काम निराळं होतं. पण तोवर मीही बंडखोरीच्या वयातून त्या भूमिकेच्या वयाच्या जरा जास्त जवळ गेले होते, म्हणूनही असेल. अतीव आवडलं ते लेखन आणि कामही. जोडीदार नको असं नाही, पण आर्थिक-सामाजिक तडजोडी करण्याची गरज संपल्यामुळे, इंटरनेट स्मार्टफोन्ससह बहुमितीय ओळखींशी झगडत असल्यामुळे... जोडीदार शोधताना निराळ्याच अडचणी पेलणारी आमची पिढी. त्याबद्दलचं ते नाटक आवडलं. आणि त्यातली रसिकाची आडमुठी-किंचित छुप्या प्रकारे हळवी लिलीही आवडली. इतकी आवडली, की रसिका गेल्यानंतर सोनाली कुलकर्णीनं केलेलं ते काम बघायला मी परत गेले, पण कपाळाला आठ्या घालूनच. जणू दोष शोधायलाच. पण सोकुनं त्या भूमिकेला दिलेल्या छटा इतक्या वेगळ्या नि ताज्या होत्या की आवडलं ते काम. पण रसिकाशी निष्ठा इतकी, की 'हं, चांगलं केलंय.' असं ग्रजिंगलीच मान्य करता आलं.

'एक हसीना थी' आला नि रसिका हिंदीतच शिरली. त्या कामासाठी तिची निवड 'सुपरहिट नंबर वन'चा प्रयोग बघून झाली होती असं कळल्यावर मलाच उगाच जाम भारी वाटलेलं. कारण जेमतेम आठदहा प्रेक्षक असलेल्या चार-पाच प्रयोगांतला एक मी पाहिलेला. तिला हिंदीत बिनधास्तपणे वावरताना बघून जाम बरं वाटायचं, 'अर्थात! ती नाही तर कोण!' असं वाटायचं. 'भूलभुलैया'तली केरसुणीनं हूल देऊन अक्षय कुमारला हाकलायची ॲडिशन तिनं घेतलेली असणार आणि सेटवर लोक हसून वेडे झाले असणार, असं मला पाहताक्षणी वाटलं होतं. अजूनही वाटतं. 

पण हिंदीतली रसिका नंतरच्या काळातली. त्याआधी 'प्रभात' नामक एका मराठी वाहिनीवर तीच बारा-पंधरा नाटकं आलटून पालटून लागायची काही वर्षं. त्यात रसिका असलेलं 'गंमत-जंमत' हे नाटक असायचं. त्यात किती प्रकारच्या भूमिका केल्या होत्या तिनं! त्या टीव्हीवर पडीक असल्यामुळे मनमुराद बघता यायच्या. त्यातली तिची 'राड्डो'चं घड्याळ मिरवणारी नवश्रीमंत महिला आणि दाताच्या फणी पुढे असलेली बाई विशेष आठवते. त्यात तिची रेंज दिसे. चकित वाटायचं या जाडजूड देहाच्या, आडव्या बांध्याच्या मुलीचा आत्मविश्वास आणि शरीरावरची पकड बघताना. 'खबरदार'मध्ये ती संजय नार्वेकरची आई होती. कष्टकरी नऊवारी पातळ आणि कजागपणा यांचं मिश्रण रसिकाला कायच्या काय शोभून दिसलं होतं. 

नाटक चालू असताना फोनवर बोलणाऱ्या नि बोलता बोलता चक्क स्टेजवरच्या रसिकाला हातानं 'एक मिनिट हं, झालंच.' अशी खूण करणाऱ्या एका प्रेक्षकाची तिनं हतबल संतापानं केलेली, अवधूत गुप्तेच्या कार्यक्रमातली नक्कल थोर होती. या विषयावर ती आणि तिचा नवरा एक स्वतंत्र प्रयोग सादर करू शकतील कदाचित, असं वाटून गेलं होतं.

एकदा आशियाई चित्रपट महोत्सवाच्या दिवसात 'प्लाझा'बाहेर रेंगाळताना मला रसिका नि मुक्ता दोघी एकदम सुटकेसा खरेदी करताना दिसल्या. मला इ त क्या बेहद्द आवडणाऱ्या दोन नट्या एकत्र समोर बघून काही सुचलंच नाही बोलायला. तसंही जाऊन सांगणार काय, 'तुम्ही किती भारी आहात!' असं?! मग त्या दोघी प्लॅस्टिकचं हसू हसणार. नकोच ते. असं वाटून मी उलट फिरून तिथून निघून गेले. 

रसिका गेल्याचं कळल्यावर बाकी कशापेक्षाही माझी मेजर चिडचिड झाली होती. That was not fair. तिला किती काम करायचं होतं अजून. याला काय अर्थ होता? तिला कुणीतरी उलटी दमदाटी करून थांबवून घ्यायला पाहिजे होतं. पण तिला दम देणारं होतं कोण?

मराठी नट्या ०१

नटांच्या अभिनयाबद्दल भरभरून लिहितात, तसं नट्यांच्या बाबतीत होत नाही. नटी म्हटलं की मधुबाला-टाईपचं सौंदर्य आठवण्याची प्रथा आहे. पण मराठीत कसली एकाचढ एक नट्यांची परंपरा आहे! नि रूढ सौंदर्यबिंदर्य राहिलं बाजूला – बघणार्या माणसावर फुंकर टाकून मंतरून टाकणारा अभिनय नि वावर नि व्यक्तिमत्त्व असलेल्या नट्या. रेंज आणि इंटेन्सिटी आणि सूक्ष्मातिसूक्ष्म भाव दाखवण्याची क्षमता वागवणार्या. शबाना आझमी ‘Why actress? I am an actor.’ म्हणते तसं त्यांना नट्या न म्हणता कलाकार म्हणावं नि लिंगभेदासह येणारी कमनीय सौंदर्याची अपेक्षा साफ पुसून टाकावी, असा मोह होतो.
~
लीना भागवत त्यांपैकी एक. माझी कायमची तक्रार आहे, की आपण लीना भागवत या बाईच्या अभिनयकौशल्याचं पुरेसं अप्रूप बाळगलेलं नाही, कौतुक केलेलं नाही. मी कमी ठिकाणी पाहिलं आहे तिला. सगळी मिळून तीन नाटकं. त्यांतलं एक तर रेकॉर्डेड. टीव्हीवरच्या दोन-तीन मालिका. पण माझ्यावर त्या बाईनं जादू केली आहे.


रूढ अर्थानं सुंदरबिंदर तर ती नाहीच. काळीसावळी बाई. खळी पडते तिला. पण त्या खळीकडे लक्ष्य जावं, अशी कामं तिनं केलेली पाहिली नाहीत. ती कायम सर्वसामान्य मुलगी वा बाई असते. ‘अधांतर’मध्ये तिनं मंजूची भूमिका केली आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय चाळ. निवर्तलेल्या गिरणी कामगाराचं घर. मंजूचा नवराही गिरणीकामगार. पण ती आणि नवरा दोघेही आईकडे राहत असलेले. फटकळ, स्ट्रीटस्मार्ट मंजूला आईनं बिजवराकडे उजवून दिल्याचा सल आहे. पण आपलं आपण बघावं लागतं ही स्वार्थी जाणीवही. गाऊनमधला वावर, बोलता-बोलता फणकार्
यानं केसांचा अंबाडा बांधून टाकायची लकब, कोकणी ब्राह्मणेतर घर मुंबईच्या चाळीत वसलं की तोंडी येणारी बोली... लीना भागवतनं केलेल्या मंजूखेरीज दुसर्या कुणालाही डोळ्यासमोर आणणं शक्य नाही. अर्थात, हे ‘अधांतर’च्या सगळ्याच पात्रयोजनेबद्दल तितकंच खरं आहे, पण त्यानं भागवतबाईंचं पुण्य कमी होऊ नये. ‘नाय’चा तिचा उच्चार आणि जहाल नजर या दोन्ही गोष्टींना तुलना नाही. असंच तिचं काम ‘पाऊस येता येता...’ या मराठी मालिकेत बघितलं होतं. माझ्या आठवणीनुसार दैनंदिन साबणवड्या सुरू होण्याच्या जस्ट आधीच्या दिवसांतली ती मालिका होती. त्यातही ती एका कनिष्ठमध्यमवर्गीय विवाहितेचं काम करत असे. आपल्या बहुधा फेमिनिस्ट नणंदेला उद्देशून तिनं उच्चारलेलं “राह्यलं. फडकवा – स्त्रीस्वातंत्र्याचे झें-डे!” हे वाक्य मला अजुनी आठवतं. त्यातली तुच्छता, जाणतेपणा, राग... सगळंच एकमेवाद्वितीय होतं. तशीच तिनं पालेकरांच्या ‘कैरी’मध्ये केलेली मोलकरणीची भूमिका. किती कमी संवाद आहेत तिला! पण तिचा नुसता वावर – चवचालपणा, नागडा स्वार्थ, देहाचा पुरेपूर वापर करणारी मानसिकता, नायिकेच्या नवर्याला पदराला गुंडाळून घेतल्याचा ताठा... या सगळ्याचा गाळीव अर्क तिच्या वावरात आहे. लीना भागवत पडद्यावर दिसत असली की ती तीन-पदरी मंगळसूत्राची फॅशन आणणार्या जान्हवी नामक नायिकेची मालिकाही मी चुपचाप थांबून बघायचे. नवर्याच्या आत्यंतिक प्रेमात असलेली, पण सासूच्या धाकामुळे त्याला चोरून भेटत असणारी, भाबडी, धांदरट, प्रेमळ बाई अशी तिची भूमिका होती. लीना भागवत त्या फडतूस मालिकेतले काही क्षण बहारदार करून सोडायची. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतलं तिचं काम याच धाटणीचं होतं. मध्यमवयीन, संसारी, प्रेमळ गृहिणीचं. निव्वळ लीना भागवत – मुक्ता बर्वे एकत्र दिसल्यावर काय होईल, या उत्सुकतेपोटी ती मालिका बघितली जायची. तेंडुलकरांच्या ‘अशी पाखरे येती’चा नव्या संचातला प्रयोग मी पाहिला होता. त्यात ती सरू होती. नि काय होती! अहाहा...

ती होती म्हणून तिचं नि मंगेश कदमचं काम असलेलं एक नाटक बघायला गेले. त्यात हे थो हो र ह जोडपं मंचावर काहीतरी बोलत होतं. मग शशांक केतकर नावाची नुकतीच मराठी मालिकेतून लोकप्रिय झालेली एक पुटकुळी येऊन स्टेजवर फुटली. लोकांनी प्रेक्षागारातून ‘श्री! श्री!’ – हे त्याचं मालिकेतलं नाव – अर्थात – अश्या चकित-भारावलेल्या हाका मारल्या नि आपण अशा प्रेक्षकांत असायची लाज वाटून मी उठून आले. असो.

अजूनही ‘भाडिप’ची डोक्यात जाणारी कांदेपोहे-स्फुटमालिका बघितली जाते, त्याला कारण ही बाई. कर्तृत्वाचा काही संबंध नसता निव्वळ राहत्या शहरामुळे आलेला आत्मविश्वास, आगाऊपणा, भोचकपणा, मानभावीपणा... लीना नाही दाखवणार तर कोण?!

‘दिल के करीब’मध्ये सुलेखा तळवलकरनं तिची एक मुलाखत घेतली आहे, त्यात ती मंगेश कदम आणि तिच्या लग्नाविषयी, तिच्या कामाविषयी, कामाविषयीच्या तिच्या दृष्टीकोनाविषयी बोलते. ती मुलाखत बघून अलीकडच्या काळात लीना भागवत बघण्याची माझी तहान काही अंशी शमली. पण तिला तिच्या स्वभावामुळे तिच्या योग्यतेचं काम मिळत नसणार, असंही वाटून गेलं. तिनं आजवर जे केलंय त्याहून वेगळं काही न केलं, तर तिच्यावर आपल्याला जे येतं, तेच करत राहिल्याचा आरोप होऊ शकेल. तिचा वकूब पुष्कळ आहे. तिनं नि मराठी नाटक-सिनेमावाल्यांनीही ओळखावा तो.

मेहंदी से जला के उंगलीयाँ...

आमच्या इमारतीबाहेर कुंपणबिंपण होण्याच्या पूर्वी तिथे मेंदीची झुडपं होती. त्याची पानं वाटून एखाद्दोनदा हाताला बांधण्याचा उपद्व्याप केलेला आठवतो. पण आमची खरी भिस्त मेंदीच्या तयार कोनांवरच असायची. ते कोन चांगले आहेत ना, असं दुकानदाराला चारचारदा विचारून मग आणायचे. नि तरी तो अडकायला लागला तर, म्हणून सेफ्टीपिना, टाचणी, एखादं फडकं, सेलोटेप असा सगळा सरंजाम तयार ठेवायचा. तेव्हा आयते कोनही तसे अपूर्वाईचेच होते पण. बाबांची चित्रकला चांगली असल्यामुळे त्यांच्याकडून आईनं मेंदी काढवून घेतल्याचीही मला आठवण आहे. पण त्यात काही रोमॅंटिक वाटायची ऐवजी आईचा चिकित्सकपणा, भेंडी वाटून घातल्यामुळे अतिरिक्त तार आलेली मेंदी, हिरकुटाची हजारदा मोडणारी काडी आणि त्यामुळे एकंदर कावलेले बाबा, इतकीच अंधुक आठवण. पुढे बरेच दिवस त्या प्रकरणाचा शेष रोमान्स पुरला असावा. कारण मग अनेक वर्षं काडीनं मेंद्याबिंद्या काढल्याचं मला आठवत नाही. एकदम कोनच आठवतात. पण ते ठाण्यातल्या दुकानांतून सर्रास नि खातरीचे मिळायला लागण्यापूर्वी ट्रेनने येणार्या कुणालातरी कुर्ल्याच्या स्टेशनबाहेरच्या मार्केटातून आणायला सांगत असू. मेंदी आणि मुसलमान धर्म यांची अस्फुट का होईना – जोडी जुळल्याची ती एकमात्र आठवण. बाकी मेंदी कायमच आसमंतात होती. नि बायकी नटमोगरेपणा वगळला , तर तिच्याशी इतर कसले लागेबांधे नव्हते. धार्मिक तर नव्हतेच नव्हते. एनिवे.


तर कोन. काही हौशी नि कुटीरोद्योगी लोक मेंदीचे कोन घरी करत असत. मेंदीची भुकटी पातळ कापडातून जमेल तितक्या वेळा गाळून घेणे, मग ती एकही गुठळी राहू न देता उकळून गार केलेल्या चहाच्या पाण्यात भिजवून ठेवणे, भिजवताना त्यात लिंबाचा रस – तोही गाळून! – घालणे – मग ती पेस्ट दुधाच्या पिशवीच्या कोनात भरून सेलोटेपनं तो बंद करणे... असा सगळा खटाटोप असायचा. मेंदीच्या क्लासला जाऊन तोही मी एखाद-दुसर्या वेळा यशस्वीपणे केला आहे. पण हळूहळू बाजारानं ती गरज संपवली. तरी मेंदी हा एक उपक्रम असायचा. दुसर्या दिवशी रविवार हवा. कोन तर हवेतच. कापूस. निलगिरीच्या नाहीतर लवंगेच्या तेलाची एखादी चिमुकली कुपी. लिंबाचा रस आणि साखर यांचं संपृक्त द्रावण. शिवाय घरात लवंगा आहेत ना हे बघून ठेवायचं. मेंदीचं एखादं पुस्तक. तेव्हा ‘लोकप्रभा’ आणि ‘साप्ताहिक सकाळ’ वर्षातून एकेकदा मेंदी विशेषांकही काढायचे. ते जपून ठेवलेले अंक. मग कुठलं डिझाईन कुणाला ते ठरवायचं. शेजारच्या काकी कलाकार. त्यांना ते दाखवून त्यांच्याकडून अप्रूव करून घ्यायचं. नि मग रात्री काकी पेंगायला लागेस्तो मेंदी प्रकरण सुरू. हाताला निलगिरीचं तेल लावून घ्यायचं. काढताना हात हलवायचा नाही, मेंदी काढल्यावर वाळेस्तो वाकवायचाही नाही. मेंदी किंचित सुकू लागली की मग अलगद कापसानं लिंबूसाखरेचा पाक लावायचा तिला, की मग ती हाताला घट्ट चिकटून बसते. आधीच हातावर रेखाटलेली ओली मेंदी काहीच्या काही सुंदर दिसते. त्यात तो साखरेचा द्राव तिच्यावर बसला की तिला चकाकी चढायची. हाताकडे बघत राहावं वाटायचं. कोयर्या, वेलबुट्ट्या, ग्रेसफुली वळलेले ग आणि ह ल्यालेल्या वेली, पाना-फुलांचे नाना प्रकार, हंस, मोर, चक्रं, शंख, हत्ती... यांचीच कॉम्बिनेशन्स असलेल्या नक्ष्या. चोचीत चोच घातलेले हंस बघताना मला अगदी टिपिकल बायलट वाटायचं, ते बहुधा या सगळ्या चित्रांमधला स्टिरिओटिपिकल बायकी नाजूकपणा जाणवल्यामुळेच असावं. पण हाताला वळणच इतकं पडलं, की आता कागदावर डूडल काढतानाही असलंच काहीतरी हातून उमटतं. पुढे कधीतरी एकदा कोयरी हे स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतीक आहे हे ऐकल्यावर मी अवाक झाले होते. आश्चर्य, चिडचिड, आणि मग पुन्हा वळून तो डौलदार आकार हट्टानं रिक्लेम करण्यासाठी झगडणं. एनिवे! नि हो, एका हातावर दुल्हा नि एका हातावर घुंगटातली दुल्हन असंही एक असायचं. दोन्ही हात एकमेकांशी जोडून त्याची ओंजळ केली, की ते एकमेकांकडे बघताना दिसणारे, असा लग्नाच्या अल्बममधला एक फोटोही ठरलेला असायचा. हल्ली काय असतं काय कळायला मार्ग नाही. पण हे दुल्हा-दुल्हन डिझाईन मात्र स्ट्रिक्टली फ-ह-क्त-ह नवर्यामुलीसाठी. तिच्या मेंदीत नवर्याचं नाव लिहायचं नि मग नवरा सुहागरातीला ते शोधेल असाही एक भाबडा संकेत मनात अनेक वर्षं होता. नवर्याचं वा प्रियकराचं प्रेम असेल तर मेंदी रंगते, हा विड्याच्या बाबतीतला कॅरीड फॉर्वर्ड संकेत मात्र आमच्या विश्वात शिरला नव्हता. एखादीची मेंदी अती रंगली (“अय्या! हिची काळी झाली बघ!”) तर ‘काय हीट आहे गं तुझ्या अंगात.’ इतपतच आमची धाव. ती मेंदी रंगावी म्हणून कोण कर्मकांडं. मेंदी वाळून पडून जायच्या आत साखरेचं पाणी तर झालंच, पण आधी निलगिरीही त्याचसाठी. झोपताना हात अलगद उशाकडे वर ठेवून झोपायचं. तोही पालथा नाही! उठल्यावर सगळीभर मेंदीचे कणकण पडलेले असायचे नि बाबा वैतागायचे. ती मेंदी काढून टाकतानाही सुरीबिरीनं खरवडून काढायची. पाणी लावायचं नाही. चुन्याच्या पेस्टचा एक थर द्यायचा. मग लवंगा तव्यात तापवून त्यावर हात शेकवायचे. जमेल तेवढा वेळ हात न धुता वावरायचं. कुणाची किती रंगली, ते तपासून बघायचं.

माझ्या आजूबाजूला कुठेच मुलगे नव्हते. मावसभाऊ होते, पण ते मेंदीच्या खटाटोपात अजिबात नसायचे. त्यामुळे एखाद्या मुलाला हे सगळं बघून मेंदीचं अप्रूप वाटतं का, मेंदी काढून घ्यावीशी वाटते का, नि मग बाकीचे लोक त्यांच्याशी कसे वागतात, ते मला बघायला मिळालं नाही कधीच. पुढे एकदा एका गे मित्रानं कौतुकानं मनगटावर मेंदीनं काढलेली काकणं दाखवली होती, तेव्हा त्याच्या गे असण्याशी हे जोडलं जाईल का हा प्रश्न मला पडल्याचा आठवतो. पण हळूहळू आपण लिंगभावाबाबत निदान शहरांतून तरी तसे बर्यापैकी खुले होत गेलो आणि मेंदी मागे पडत गेली. आपण खुले झालो हे ठीकच. पण मेंदी मागे पडली हे जरा खटकतं. मला तिच्याबद्दल कधी कसली अढी नव्हती. तिला स्त्रीत्वाचे लागेबांधे लगडलेले असूनही आणि मला स्त्रीवादाचे वारे लागल्यानंतरही मला मेंदी मनापासून आवडायची. लग्नाची मेंदी काढून पहिली कमाई करण्यापासून ते सख्ख्या मैत्रिणीच्या लग्नाच्या आधल्या दिवशी मेंदी काढताना दोघींनीही उद्यापासून बदलणार असलेल्या परिस्थितीचा ताण वाटून, कंटाळून ‘मरो मेंदी’ असं म्हणत गप्पाच मारत बसण्यापर्यंत अनेक प्रकारे मेंदी आयुष्यात होती. आहे.

कोरड्या, ओल्या, नंतर रंगलेल्या मेंदीचा – असे तीन स्वतंत्रपणे ओळखू येणारे धुंदावणारे गंध. हातांवरून वाहत असल्यासारखे दिसणारे ते डौलदार आकार. रंगण्या-न रंगण्याबद्दलची उत्कंठा. सगळंच बेहद्द आवडायचं. आवडतं. ‘बेहनों ने रौशनी कर ली, मेहंदी से जला के उंगलीयाँ’ ही 'पिंजर'मधली ओळ ऐकल्यावर हटकून रंगलेल्या मेंदीचा आतून उजळल्यासारखा दिसणारा केशरी रंग आठवायचा नि तो रंग पाहिला की कधीही तीच ओळ मनात उमटायची. ‘गीली मेहंदी की खुशबू’ लिहिणारा गुलजार मित्रासारखा वाटायचा, त्याचं तेही एक कारण असणारच, इतकी मला मेंदी प्रिय.

आत्ता काही श्रावण नाही. पण श्रावणात लिहायला बसलं तर हे अजूनच क्लिशेड वाटणार आहेच. म्हणून आत्ताच मनात आल्याक्षणी let's indulge म्हणत निखळ नॉस्टाल्जियाला शरण जाणं.

बुजरी गाणी १०

कसल्यातरी आघातानं एकाएकी मोठं होऊन बसावं लागलेल्या लोकांचं वाढलेलं वय निराळं कळतं. त्या वाढलेल्या वयात राठपणा असतो, पण त्यासोबत येणारी सुंदर नैसर्गिक प्रगल्भता नसते. नुसताच जगाला फसवू शकणारा मुखवटा असतो. काही कारणानं त्याला तडा गेला, की वाढता वाढता थबकून राहिलेलं कोवळं मूल भांबावून बाहेर डोकावू लागतं. नजरेत वयाला न जुमानणारी आर्तता येते. ती या गाण्यातल्या नायकाच्या नजरेत आहे.

‘अग्निपथ’च्या नायकाची गोष्ट ही हिंदी सिनेमाच्या नायकाची स्टॅंडर्ड गोष्ट – बापाच्या खुनाचा सूड घेऊ पाहणाऱ्या मुलाची. सगळ्यांना चिरपरिचित असलेली. पण गाण्यात सुडाचा प्रवासबिवास नाही. निखळ मूलपण आहे.

सगळी घासून गुळगुळीत झालेली दृश्यं दिसतात गाण्यात. लहानपणीच्या आनंदाशी लागेबांधे असलेली. फुगे हातात घेऊन उडवणं, समुद्रकिनारी धावत सुटणं, साबणाचे फुगे उडवणं, आकाशपाळण्यात बसणं, फॅमिली फोटो काढून घेणं... सगळी मूलपणाशी निगडित असलेली ठरीव-साचेबद्ध सुखं. पण त्यात किती आर्तता भरली जाते सोनू निगमच्या सुरांनी आणि हृतिकच्या नजरेनी! त्याची धाकटी बहीण त्याला इतक्या वर्षांनी प्रथमच भेटलीय. तिला मिठीत घेतल्यापासून ते पार गाण्याच्या शेवटापर्यंत हृतिकच्या नजरेतला अविश्वास काही केल्या लपत नाही. जणू या साध्या-साध्या सुखांवर त्याचा हक्क नाहीचेय. कुणीतरी येऊन त्याचं स्वप्न मोडून टाकेल नि त्याला जाग येईल, म्हणून सावधपणी सुखाची चव चाखावी, असा तो गाणंभर वावरताना दिसतो.

गाण्यात त्याची प्रेयसी असलेली प्रियांका चोप्राही आहे. पण हृतिक आणि ती यांच्यातला रोमान्स कुठेच नाही. ती जणू त्या बहीणभावांना जवळ आणू पाहणारी मैत्रीण आहे निव्वळ. नायकाची बहीण, नायक, आणि नायिका या तिघांचा ग्रुप फोटो काढताना एका क्षणी नायकाचा अवघडलेपणा फुटून जातो नि ते हसून एकमेकांकडे प्रेमभरानं बघतात, त्या क्षणी एकाएकी ते तिघंही कुटुंब होऊन जातात.

तो त्याच्या लहानग्या बहिणीचा लहानपण हरपून गेलेला भाऊ होतो. तिच्यासोबत अडखळत साबणाचे फुगे काढतो, ते न जमून स्वतःलाच हसतो. तिला पाळण्यात बसवल्यावर, उंच गेलेल्या तिच्याकडे कौतुकभरल्या नजरेनं पाहताना, तो तिचा बापही होतो; तेव्हा ‘ये लम्हां कहाँ था मेरा....’ असं विचारणारा सोनू निगमपण आपल्याला उंच उंच घेऊन जातो...

सुरात आणि दृश्यात इतकी आर्त कोवळीक भरणारं हे गाणं फार फार आवडतं.

~


अभी मुझ में कहीं बाकी थोडी सी है जिंदगी
जगी धडकन नई, जाना जिंदा हूँ मैं तो अभी
कुछ ऐसी लगन, इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा
अब है सामने, इसे छू लूँ जरा, मर जाऊँ या जी लूँ जरा
खुशियाँ चूम लूँ, या रो लूँ जरा, मर जाऊँ या जी लूँ जरा

धूप में जलते हुए तन को, छाया पेड की मिल गई
रूठे बच्चे की हंसी जैसे, फुसलाने से फिर खिल गई
कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है
बरसों पुराने जख्म पे मरहम लगा सा है
कुछ ऐसा रहम, इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा

डोर से टूटी पतंग जैसी, थी ये जिंदगानी मेरी
आज हो कल हो मेरा ना हो, हर दिन थी कहानी मेरी
इक बंधन नया पीछे से अब मुझको बुलाये
आने वाले कल की क्यों फिक्र मुझको सता जाये
एक ऐसी चुभन, इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा

~
नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.


Monday 4 September 2023

चाळीस वर्षं ओलांडून आलेली मैत्रीण


एकेरीत उल्लेख करायला पद्मजा फाटक मला समवयस्क नव्हे. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर वगैरे लोकांसारखी आपोआप एकेरीतली जवळीक प्राप्त होण्याइतकी सुप्रसिद्ध आणि थोर कलावतीही नव्हे. पण तरीही तिच्याशी झालेल्या पहिल्याच पुस्तकभेटीनंतर तिच्याविषयी ‘आदरणीय लेखिका पद्मजा फाटक’ या जातीचं काही न वाटता मैत्रिणीसारखी जवळीक वाटली आणि वाटतच राहिली, त्यामागची कारणं किंचित गुंतागुंतीची आहेत.
ललित लेखिका म्हणून आज मराठीत ती फारशी प्रसिद्ध उरलेली नाही. ‘बाराला दहा कमी’ आणि ‘हसरी किडणी’ यांसारखी तिची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. पण ‘गर्भश्रीमंतीचं झाड’ आणि ‘सोनेलूमियेर’ हे सुरेख ललितलेखसंग्रह सहजासहजी मिळत नाहीत. मग तिच्या सुरुवातीच्या काळातले ‘राही’ आणि ‘दिवेलागणी’ हे कथासंग्रह कुठून मिळणार? मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं आणि नंतर एका मित्राच्या शोधक नजरेमुळे मला ‘दिवेलागणी’ हा कथासंग्रह मिळाला.
या कथासंग्रहाविषयी सांगण्यापूर्वी पद्मजाची थोडी पार्श्वभूमी सांगणं भाग आहे. आज ती हयात असती, तर ती ऐंशी वर्षांची असती. साधारण तिच्या विशीबाविशीपासून ती लिहीत होती असावी. आई-वडील दोघेही सुशिक्षित, नोकरदार. लहानपणापासून कायम शहरात झालेलं वास्तव्य. उच्चशिक्षण, लेखनप्रकल्प, सांस्कृतिक वर्तुळातला वावर, मुलाबाळांसकट सुफळसंपूर्ण संसार, पुरस्कार आणि वाचकप्रियता अशा दोन्ही आघाड्यांवर लेखनात मिळालेलं यश... अशा सगळ्या प्रकारे ती चमकदार, पण चाकोरीतली व्यक्ती होती. पण लेखिका उर्फ स्त्रीलेखक म्हटल्यावर बंडखोरी वा बोल्डनेस वा स्त्रीस्वातंत्र्याचे झेंडे वाहण्याची जबाबदारी वा शोषित अबलांचा कळवळा अशा ज्या गोष्टी बघणार्याच्या नजरेत आपोआप उमटतात, त्यांपैकी कुठल्याही गोष्टींच्या अभिनिवेशाची ओझी तिच्यापाशी मुळातच नव्हती. पण म्हणून ती झापडबंद होती असं मात्र नव्हे. स्त्रीवादाचं चोख भान तिच्यापाशी होतं. हे माझ्या मते तिचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य. विवेक, वैज्ञानिकता, तर्कशुद्धता, सर्वार्थानं कॉस्मोपॉलिटन नजर ही सगळी आधुनिक मूल्यं... त्याखेरीज आलेली.
या कथासंग्रहात तिची ही सगळी वैशिष्ट्यं दिसतातच, शिवाय त्या-त्या मूल्यांना अनेकदा लगडून येणारा तर्ककठोरपणा न येता मानवी भावनांविषयी असलेलं कुतूहल आणि आस्था दिसत राहतात.
अंतर्बाह्य शहरीपणा हा तिचा ठळकपणे जाणवणारा गुण. ‘बेस्ट’च्या बसमधल्या सहप्रवासिनीच्या इतिहास-भूगोलाविषयी आडाखे बांधणारी निवेदिका ‘मूर्त’ या कथेमध्ये आहे. त्यातून तिच्या शहरी अवकाशाची भौतिक खूण पटते. ‘सर्किट हाऊस’ या कथेत अस्तित्ववादी प्रश्नांमध्ये गुरफटलेला लेखक-निवेदक ऑटो-पायलट मोडवरून सराईतपणे मागे पडणार्या उपनगरी स्टेशनांची नोंद घेताना दिसतो. ‘म्हातार्या’ या कथेतली तरुण नायिका आपल्या म्हातार्या आईच्या काश्मीर सहलीची तयारी करून देणारी. आपल्याला पाठमोरं बघणार्या आपल्या आईला नि तिच्या मैत्रिणीला आपल्या ‘स्मार्ट’ दिसण्याची असोशी असेल हे उमजून दमले-भागलेपण विसरते आणि उंच टाचांमधली आपली आकृती बघता बघता ताठ करून आत्मविश्वासानं पावलं टाकत जाते. अशा कितीतरी शहरी – आणि त्यातही मुंबईसारख्या आधुनिक शहराच्या खाणाखुणा या कथांमध्ये विखुरलेल्या आहेत. पण पद्मजाचा शहरीपणा या भौतिक आणि भौगोलिक खुणांपुरता मर्यादित नाही. तिचं खरंखुरं कॉस्मोपॉलिटन शहरीपण तिच्या नायक-नायिकांच्या मूल्यव्यवस्थेपर्यंत झिरपलेलं दिसतं. ‘हायड्रिला’ या कथेत कुठल्याच अस्मितांची आणि परंपरांची मुळं नसलेला विद्याधर हा नायक आहे. कुटुंबव्यवस्था, जातीचं वर्तुळ, भाषिक अस्मिता, प्रादेशिक लागेबांधे... त्याला स्पर्शत नाहीत. त्याला मानवजातीशी जोडणारा धागा आहे, तो माणसाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संतत ज्ञानतृष्णेचा.
‘पाहुणा’ या कथेची नायिका मध्यमवयीन पुरंध्री आहे. ध्यानीमनी नसताना पदरात आलेलं अवेळचं गरोदरपण खुडून टाकण्याचा तर्कशुद्ध, विचारी निर्णय ती घेते खरी. तो शांतपणानं पार पाडते. पण सगळं धडपणी झाल्यानंतरही, कुठलंही दृश्य वैद्यकीय कारण नसताना शरीराला आलेलं घायाळपण आणि मनाची कासाविशी हटता हटत नाही म्हटल्यावर अंतर्मुख होत जाते. स्त्रीचा स्वतःच्या शरीरावरचा हक्क आणि पूर्ण निर्मितिक्षम शरीरापासून काहीतरी हिरावून घेतलं जाताना होणारी हिंसा यांच्यातलं द्वंद्व निरखून पाहते. आधुनिक दृष्टी असलेल्या व्यक्तीमधली ही तरल संवेदनशीलता हे या सगळ्याच कथांचं वैशिष्ट्य आहे. ‘अनअव्हॉइडेबल एक्स्पेंडिचर’ या कथेतली नायिका याच संवेदनशीलतेपोटी स्वतःला आरोपी करून प्रश्न विचारते आणि सरतेशेवटी आपणही जगासारखे ‘सोयीस्कररीत्या’ संवेदनशील, अशा, औषधाच्या कडू गोळीसारख्या गिळाव्या लागणार्या, निष्कर्षावर येते. तशीच ‘अनुभव’ आणि ‘दिवेलागणी’ या एकाच जातकुळीच्या कथांची नायिकाही. म्हटलं, तर त्यांतलं ‘विवाहित स्त्रीचा मित्र’ हे सूत्र काहीसं सरधोपट आहे. पण त्याकडे बघण्याचा नजरिया मात्र खास पद्मजाचा. ‘मैत्रीची एक स्वतंत्र कमिटमेंट’ असते आणि ‘संपून गेलेल्या मैत्रीचीही डिग्निटी’ सांभाळायची असते असं मानणारी त्यांतली नायिका पारंपरिक कौंटुबिक चौकटीविरुद्ध बंड करत नाही, पण मैत्र या अतिशय आधुनिक नात्याचं मोठेपण मात्र ती मनोमन मानणारी आहे.
‘विदुर’ या कथेतल्या नायिकेला एका उतरत्या दुपारी चक्क भूत दिसावं, तशा एका वृद्ध आणि मृत परिचितांचं दृश्यरूप समोर साकारताना दिसतं. ‘आपण हे नक्की काय अनुभवतो आहोत?’ असा प्रश्न मनात उमटत असताना, पूर्ण जागेपणी आलेला हा अनुभव. पण नायिकेची त्याकडे पाहणारी दृष्टी सजगपणे विज्ञाननिष्ठ आहे. पण तसं असूनही ती तो अनुभव नाकारत नाही. चाकोरीबाहेरचं आयुष्य जगण्याची ओढ, त्याकरता घ्याव्या लागणार्या निर्णयांमधून अपरिहार्यपणे दुखावले जाणारे आप्त, वार्धक्यामधली असहायता, एकंदर मानवी आयुष्यातलं स्वयंनिर्णयाचं कःपदार्थ स्थान... अशा, मोठा आवाका असलेल्या प्रश्नांकडे वळण्याकरता एका अद्भुत अनाकलनीय अनुभवाचा माग वापरावा, तशी ती कथा.
दात विचकत आणि बाहू फुलवून दाखवत, एकमेकींसमोर गोल-गोल फिरून एकमेकींच्या शक्तिसामर्थ्याचा अंदाज घेत, धीम्या पण निश्चित गतीनं, बाहेरच्या वर्तुळांतून अधिकाधिक आतल्या स्नेहवर्तुळांमध्ये शिरत जाणार्या दोन टोकदार स्त्रियांविषयीची कथा म्हणजे ‘माझ्या मुलीचा गॉडफादर’. हिंदी सिनेमानं भावनातिरेकी केलेल्या मैत्री नावाच्या एका नातेसंबंधात किती प्रकारची सूक्ष्म राजकारणं, डावपेच, खेळ्या-प्रतिखेळ्या असतात त्याचं भान ही कथा आणवून देते. मात्र तिचा शेवट कडवट नाही. त्यात मैत्री या नात्याविषयीचा उमदा आशावाद आहे.
‘स्पर्शाची’ ही कथा पूर्णतः वेगळ्या वाटेवरची. कुणी नेटके शब्द साठवावेत, कुणी सुरांचा छंद करावा, तशी निरनिराळे स्पर्श भोगून पाहणारी, साठवून ठेवणारी, त्यांद्वारे संवाद साधू पाहणारी एक मनस्वी स्त्री आणि तिच्या मैत्रीत पडलेली नायिका. या कथेच्या विषयात आणि कथानकात वेधक निराळेपण आहेच. पण त्याहूनही मला अतिशय आवडते, ती लेखिकेनं रेखाटलेल्या नायिकेची स्वतःच्या संकुचितपणाकडे हसत हसत लक्ष वेधणारी दृष्टी. मैत्रिणीच्या जगावेगळ्या छंदावर आक्रमकपणे हल्लाबोल करताना नायिकेचा आवाज ‘चिरकतो’ आणि अखेर ती ‘धांदरटासारखी’ माघार घेत मैत्रिणीच्या बोलण्याचा खुल्या मनानं विचार करू बघते. तिला आपल्या चौकटी मोडायच्या नाही आहेत, पण त्याच वेळी त्याबाहेरच्या जगाविषयी तुच्छता नाही, उत्सुकता आहे. हे मिश्रण सुरेख तर होतंच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे माझ्या पिंडाला आणि जडणघडणीला जवळचं वाटणारं होतं.
बहुतांश स्त्रीवादी लेखिकांना त्यांच्या आविष्कारासाठी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर शहरी अवकाश उपलब्ध झाला, हे सत्य आहे. पण हा अवकाश पद्मजाच्या कथांचा – खरं तर सगळ्याच लेखनाचा – आतलेपणानं हिस्सा झाल्याचं दिसतं. तिच्या अवघ्या लिहिण्यातून त्याच्या खाणाखुणा सतत दिसत राहतात. तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून, सुशिक्षित-कमावती-प्रॅक्टिकल आई आणि नास्तिक-नि-प्रेमळ वडील लाभण्यातून, चौकोनी कुटुंब मिळण्यातून, शहरातला जन्म नि वास्तव्य असण्यातून, चिकित्सक नि विवेकी संवेदनशीलतेतून, अगदी उच्चवर्णीय उच्च-मध्यमवर्गीयपणातूनही - तिच्या लिहिण्याला जो विशिष्ट आकार आला, तो मधली चाळीस वर्षं ओलांडून माझ्यापर्यंत थेट येऊन पोचला, मला भिडला. कॉस्मोपॉलिटन शहरांमधल्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्था आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर्स, लेखन-वाचन-सिनेमे-नाटकं-शिक्षण-परिसंवाद इत्यादी सारस्वती वर्तुळं, उच्चवर्णीय समाजातल्या जन्मामुळे आणि सुधारकी कुटुंबांमुळे परंपरांशी झगडावं न लागता त्यांचे फायदे तितके मिळणं नि तरी त्यांकडे पाहायची जबाबदार नजर म्यान न करता येणं, स्त्रीत्वाचा अहं वा न्यून असा कुठलाच गंड नसणं... हे सगळं मॅचिंग असल्यामुळे - वा निदान हवंहवंसं असल्यामुळे – ती मला एखाद्या समवयस्क मैत्रिणीसारखी भासली.
पुढे अतिशय आवडीनं मिळवलेल्या तिच्या सगळ्या लेखनात तिचा हाच स्वभाव बर्करार राहिलेला जाणवला. उतारवयात किडण्या निकामी झाल्यावर करावं लागलेलं किडणीचं रोपण, त्यासाठी मित्रपरिवारातून आर्थिक बळ मिळवणं, ते करताना मिंधेपण न येऊ देणं, सतत विवेकी दृष्टीकोनातून आपल्या कृतींची योग्यायोग्यता तपासत राहणं, तसं करताना किडणीच्या आजारपणाचे तपशील-त्याबाबतची सामाजिक-वैद्यकीय निरीक्षणं-आत्मपरीक्षण नोंदणं... हे सगळं लीलया कवेत घेणारं ‘हसरी किडणी’ हे पुस्तक काय; किंवा अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास अशा ढोबळ वर्णनात कसंबसं(च) बसेल असं ‘बाराला दहा कमी’ हे पुस्तक काय. विवेकी-अभ्यासू-व्यापक-आधुनिक नजर आणि त्याच वेळी स्वभावातला गमत्येपणा ही तिच्या लिहिण्याची व्यवच्छेदक लक्षणं. बायका आणि दागिन्यांशी असलेले त्यांचे (आणि तिचे स्वतःचे) संबंध, दगडांची झाडं बनवण्याची खास अमेरिकी कला, तिच्या आजारपणात तिला आलेले काही अतींद्रिय अनुभव आणि खास पद्मजा-पद्धतीत शोधलेली त्यांची वैज्ञानिक स्पष्टीकरणं, लहान मुलांचं साहित्य, आइनस्टाइनचं घर... यांवरचं तिचं लिहिणं आजारपणानंतर आणि वाढतं वय जमेस धरूनही विलक्षण ताजं-तरुण होतं. 'स्मायली', 'टेडी बेअर', ओरिगामीत भेटणारा जपानी करकोचा अशा गोष्टींवर लिहून त्यांच्याशी आधुनिक समाजांचे असलेले लडिवाळ संबंध उलगडून दाखवावेत, तर ते तिनंच.
मराठीत सशक्त स्त्रीवादी ललितलेखनाची परंपरा आहे. त्यांच्याशी तुलना करता काय दिसतं? गौरी जवळ जवळ परग्रहावरची वाटावी अशा जगातली भासणारी. तिच्या साहित्यातल्या विश्वाला मराठी मध्यमवर्गीय मर्त्य जगाचे नियम जणू लागूच नाहीत. सानिया कमाल गंभीर आणि अनेकदा वाचकावर विसंबून अनेक गोष्टी न उच्चारता सोडून देणारी. मेघना पेठेचं नातं मला गौरी वा सानिया यांच्यापेक्षाही जी. ए. कुलकर्णींशी अधिक जवळचं वाटतं. पद्मजाच्या लिहिण्यात आणि जीवनदृष्टीत एक प्रकारचा रसरशीतपणा, जीवनसन्मुखता, निकोपता दिसते - लोभस वाटते.
आमच्यात इतकं सगळं मॅचिंग नसतं नि मी एखाद्या खेड्यात जन्मलेली, शिक्षण घेणार्या पहिल्याच पिढीतली, पारंपरिक स्त्री – किंवा अगदी पुरुषच असते – तर आमची अशी नि इतकी मैत्री झाली असती का? कदाचित झाली असतीही. पण मी तिला एकेरीत संबोधू शकले नसते. तितकं अंतर तरी आमच्यात राहिलंच असतं.
~
दिवेलागणी
पद्मजा फाटक
विमल प्रकाशन
१९८८

(पूर्वप्रसिद्धी : आदले-आताचे, लोकरंग, लोकसत्ता, जून २०२३)